Monday, September 12, 2011

रिक्षाचालकांचे राज्य

ठाण्यातील मुजोर, उद्दाम रिक्षाचालकांनी बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. ठाण्यातील रिक्षावाले म्हटल्यावर ते मुजोर, उद्दाम असणारच हे आता वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. ठाण्यात कोणत्याही रिक्षा-स्टॅण्डवर वा रस्त्यात अध्येमध्ये वाट अडवून, कोप-यावर दात कोरत, विडी फुंकत, गुटख्याच्या पिचका-या मारत टवाळकी करत उभ्या असलेल्या रिक्षाचालकांना एखाद्या ठिकाणी नेणार का, असे विचारण्याचा अविचार ज्यांनी केला आहे त्या सगळ्यांना या उर्मटपणाची शाब्दिक चपराक केव्हा ना केव्हा तरी बसलेली आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडे नाकारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. पण, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रिक्षावाल्यांना कायद्यापासून, कारवाईपासून जणू अभय मिळाले आहे. ठाण्यात तर कायद्याचे नव्हे, रिक्षाचालकांचे राज्य आहे. ते म्हणतील तोच कायदा अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच समोरचा प्रवासी ज्येष्ठ नागरिक आहे की एखादी अवघडलेली महिला आहे की बाहेगावाहून मुलाबाळांसह आलेले नवखे कुटुंब आहे, याची दखल घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. रिक्षा स्टॅण्डवर रांगेत लावलेली असो वा रस्त्यात उभी असो, ‘नही जाने का’, असे झटकून टाकण्याची मुजोरी ही मंडळी सर्रास दाखवतात. भाडे नाकारणे हा त्यांना मुळी गुन्हा वाटतच नाही. जिवाचा संताप झाला तरी अपमान गिळून प्रवाशांना नाईलाजाने दुस-या रिक्षाचालकाची मनधरणी करावी लागते. अशावेळी वाहतूक पोलिस नेमके बेपत्ताअसतात. इंदिरानगरच्या नाक्यावर रिक्षाचालकांच्या याच उर्मटपणामुळे संतप्त झालेल्या दुर्योधन कदम यांनी या रिक्षाचालकांना दोन शब्द सुनावले आणि उर्मटपणा हा जन्मसिद्ध अधिकार मानणा-या रिक्षाचालकांनी कदम यांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांना मारहाण केली. या मारहाणीत कदम यांनी जीव गमावला असला तरी राज्य रिक्षाचालकांचेच असल्यामुळे या संतापजनक घटनेबद्दल, राजकारणी चमकेश मंडळी वा रिक्षा संघटनांचे आश्रयदाते राजकीय पक्ष यांच्यापैकी कुणीही निषेधाचा चकार शब्दही उच्चारलेला नाही. गणेशोत्सवातील कर्णकटू गदारोळ, वाटमारी आणि वीजचोरी करून केलेला लखलखाट मिरवण्यात मग्न पुढा-यांना रिक्षाचालकांच्या या झुंडशाहीला फटकारण्यासाठी वेळ नाही. वाहतूक पोलिसही प्रवाशांनी आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार आल्यावर आम्ही कारवाई करतोच’, हे नेहमीचे पालुपद आळवत आहेत. एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याबद्दल ठाण्यातील रिक्षा संघटनांना आत्मक्लेश होणे याची अपेक्षा करणे हाही कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणा-या सर्वसामान्यांच्या भाबडेपणाचा कळस ठरावा असेच हे भीषण चित्र आहे.

Thursday, June 23, 2011

‘अर्थ’ उघड आहे..

कल्याण-डोंबिवली पालिकेतील निलंबित लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला पुन्हा कामावर घेण्याचा ठराव महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती मागल्या दाराने मंजूर करवून घेते यामागील ‘अर्थ’ न समजण्याइतके मतदार खुळे नाहीत. जोशीची विभागीय चौकशी पूर्ण करण्यात यावी, तसेच त्याच्या खटल्याचा निर्णय लागेपर्यंत त्याला कामावर हजर करू नये, असा ठराव यापूर्वीच पालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या महासभेत मंजूर झाला असताना अचानक हा ठराव मंजूर करण्यात आला हे विशेष. प्रसारमाध्यमांतून आणि विरोधी पक्षांकडून या ठरावावर टीकेची झोड उठल्यानंतरही हा ठराव करण्यात काहीही वावगे केलेले नाही, असा निगरगट्ट खुलासा महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केला. जोशी याला घरबसल्या पन्नास हजार रुपये वेतन दिले जात आहे, त्याच्याकडून त्या पैशांचे ‘काम’ करून घ्यावे, या उदात्त हेतूने हा ठराव युतीने मंजूर केला होता म्हणे! जनतेच्या पैशाची नासाडी टाळण्याची यांची आंच एवढी मोठी की ‘रिमोट कंट्रोल’ने चालणा-या शिवसेनेच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून हे सत्कार्य तडीस नेण्यात आले, असाही हास्यास्पद दावा युतीने केला आहे. शनिवारी महासभा संपतेवेळी कार्यपटलावर नसलेला ठराव एका अपक्ष नगरसेवकाकडून आयत्यावेळी मांडण्यात येतो आणि युतीचे सदस्य कोणतीही चर्चा घडवून न आणता तो तात्काळ मंजूर करतात, महापौरबाई लगेचच राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश देऊन महासभा गुंडाळतात, या सगळ्या घडामोडींतून दिसणारी युतीची जनहिताची कळकळ आपण समजून घेतली पाहिजे. जनतेमध्ये लाचखोर जोशीबद्दल आणि त्याची निर्लज्ज वकिली करणा-यांबद्दल किती प्रचंड रोष आहे, हे लक्षात आल्यावर वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवून स्थानिक सुभेदारांचे कान उपटण्याचे नाटक रंगविले. अगदी जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या नगरसेवकांची ‘खरडपट्टी’ काढण्याचे आव आणला. खरोखरीच वरिष्ठांना विश्वासात न घेता हा व्यवहार झाला असता, तर आतापर्यंत महापौर, सभागृह नेते, जिल्हाप्रमुख यांचे राजीनामे घेतले गेले असते. ते तसे घेतले गेले नाहीत याचा अर्थ उघड आहे. या एकाच प्रकरणात युतीच्या ‘स्वच्छ’ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत असे नाही; यापूर्वीही सुरेश पवारांसारख्या भ्रष्ट अधिका-याला याच मंडळींनी ‘पावन’ करून घेतले आहे. निलंबनाची कारवाईही महापौरांनीच रोखली आहे. मनसेनेही शहरात महापौरांचा राजीनामा मागणारे फलक लावून सचोटीचे प्रदर्शन केले आहे. मात्र, भ्रष्टाचाराचा वटवृक्ष रुजवणा-या युतीला पालिकेत सत्तेवर आणण्याचे पातक त्यांच्याच माथी आहे, हे मतदार विसरणार नाहीत.

Monday, June 20, 2011

थेंबांचे इवलाले मोती तळहातावर झेलून घ्यावे...


पावसाबद्दल प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूरने लिहिलंय -
बहकीसी बारीशने फिर
यादोंकी गठरी खुलवायी
मीलें चन्द लम्हें घायल
और ढेर सारी रुसवाई...
आणि त्याच्याच एका कवितेत तो म्हणतोय -
झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे...
गुरू लिहितो अगदी आपल्या मनातलं सांगितल्यासारखं पण, तुम्ही खरं सांगा पायाला चाकं लावलेल्या तुम्हा-आम्हा मुंबईकरांना वेळ आहे का हो असं कुणाच्या आठवणींनी घनव्याकूळ व्हायला? सिमेंटच्या जंगलात सरसर उतरणाऱया पाऊसथेंबांचं स्वागत करायला क्षणभर थांबायला? `थांबला तो संपला' ही उक्ती मुंबईच्या पावसात `थांबला तो भिजला' अशी बदलते हे प्रत्येक मुंबईकरासाठी स्वानुभवाचे बोल आहेत. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर नव्हे खड्डय़ांत साचलेल्या चिखलपाण्याच्या पिचकारीने ज्याला वा जिला शर्ट, स्कर्ट, पाटलोण, साडी अशा कुठल्याही वस्त्रावर हुसैनी डिझाइन चितारून घ्यायचंय त्याने असं मध्येच पावसासाठी थांबण्याची हिंमत करावी. मुरब्बी मुंबईकर कुठेच थांबत नाही. सोसाटय़ाचा वारा आणि तुफान पावसाला कसाबसा इवल्याशा छत्रीने सामोरा जाता जाता तो ओलाचिंब झालेला असतोच. पावसाला भेटायला तो थांबला नाही तरी पाऊस त्याला येऊन कडकडून भेटतोच. घाटात, गडकिल्ल्यांकडे जाणाऱया अनवट रानवाटांवर भेटणारा झिम्माड, तुफान, बेफाम, आडवातिडवा झोडपणारा पाऊस याच सगळ्या रूपांमध्ये इथल्या इथे मुंबईतही आपली गाठभेट घेतो. खऱया मुंबईकराला हे माहिती असतं.  
यामुळेच, अडलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, लोकलमधील रखडपट्टी, फलाटांवरची अफाट गर्दी, दुकानांच्या पत्र्यांवरून ओघळणाऱया पागोळ्यांचा अभिषेक, रस्ता, खड्डे व्यापून चारीठाव वाहणारे चिखलपाणी कशाकशाने मुंबईकरांची पावले थांबत नाहीत, अडखळत नाहीत. नेमेची येणाऱया पावसाबरोबर ठरलेल्या अडचणीही दरवर्षी येणारच हे सर्वसामान्य मुंबईकरांनी आता गृहितच धरलंय. यामुळेच कितीही लटकंती झाली तरीही रस्त्याकडेला लागलेल्या गाडीवरील गरमागरम भजी आणि आलं घातलेली झकास कडक कटिंग चाय त्याला क्षणार्धात फ्रेश करते अन् मुंबई मस्त पाऊस अंगावर घेत चालत राहते!
छायाचित्रे - अतुल मळेकर, संदेश घोसाळकर

Thursday, June 16, 2011

‘स्पेशलवाला’

जे. डे गेल्यावर अनेकांनी त्याच्यावर लिहिलं, अगदी त्याच्या बातम्या नाकारणा-या वरिष्ठांनी आणि त्याला माणुसघाणा समजणा-या त्याच्या सहका-यानीही. मला डे आठवतो तो मितभाषी, आमच्या लालबागच्या कँटिनमध्ये एका बाजूला बहुतेकवेळा एकटाच बसून कडक चहाचे घुटके घेणारा. ओळख असूनही त्याला ‘हाय’ केलं तरच तो हात वर करून प्रतिसाद द्यायचा, हलकेच मान हलवायचा.. हे जवळपास दररोज घडायचं. डे ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये दाखल झाला तेव्हा ‘लोकसत्ता’त स्थिरावून मला काही वर्षे उलटली होती. काही अपवाद वगळता ‘एक्सप्रेस’च्या पत्रकारांनी ‘लोकसत्ता’ला गिनतीत धरायचं नाही आणि ‘लोकसत्ता’च्या मंडळींनीही त्यांना नजरेआड करायचं, असं अदृश्य कुंपण आमच्यात असायचं. कारण काहीच नव्हतं, पण असं जाणवत राहायचं. रिपोर्टर मंडळींच्या बाबतीत या कुंपणाला अपवाद करणारी मंडळी दोन्हीकडे होती. एखाद्या बातमीसाठी एक्स्प्रेसच्या रिपोर्टिग डेस्कवरून लोकसत्ताचा फोन वाजायचा, एखादी बातमी आणून दिली जायची, एखादी बातमी कन्फर्म केली जायची, इनपुट घेतले-दिले जायचे.. हेही रोजचंच होतं. डे या मंडळींपैकी एक होता. गुन्हे वार्तांकनाबाबत लोकसत्ता म्हणजे राम पवार आणि एक्स्प्रेसला डे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. या दोघांमध्ये चांगलं सहकार्य असायचं. लालबाग कार्यालयाच्या आवारात कधीतरी दुपारी गप्पाटप्पा सुरू असताना, उंचापुरा, ब-यापैकी दणकट शरीरयष्टीचा, थोडासा वाकून चालणारा डे छोटय़ाशा गेटमधून आत शिरायचा. मोटारसायकल आणि डे असं एक समीकरण आमच्या मनात फिट्ट होतं. बहुतेकदा नीट इन केलेला बारीक चौकटींचा हाफ शर्ट, कधी जीन्स तर कधी पँट असा डे एखाद्या साध्या वेशातील पोलिसासारखा ‘स्पेशलवाला’ दिसायचा, वावरायचा. सतत बीटवर असल्यासारखंच त्याचं वागणं असायचं. त्या पाच-सहा वर्षाच्या कालखंडात मी कधीच एक्स्प्रेसच्या इतर रिपोर्टर मंडळींच्या कोंडाळ्यात गप्पा हाणतांना, खळखळून हसताना पाहिला नाही. कँटिनमध्येही एका बाजूला बसलेल्या डेला ‘आज कुछ है क्या..’, असं विचारल्यावर तो फार काही सांगायचा नाही. तरीही काही वेळा त्याने ‘लोकसत्ता’ला बातम्यांची कॉपी दिली होती. त्या काळात ‘जे. डे’ ही बायलाइन एक्स्प्रेसच्या पानांचा अविभाज्य भाग असायची. कालांतराने ‘एक्स्प्रेस’ची साथ सोडून तो ‘हिंदुस्तान टाइम्स’कडे गेला. आता तर तो सगळचं सोडून गेलाय..

पोलिस यंत्रणेमुळेच जे. डेंचा बळी

...गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, ही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेली नेहमीची पोपटपंची आणि ‘..जे. डे यांच्या मारेक-यांना पकडले जाईल इतकेच नव्हे तर त्यांच्या हत्येचा कट रचणा-यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल’, हे मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांचे वक्तव्य, या सगळ्याला आता पाच दिवस उलटून गेलेत. पोलिसांनी जारी केलेली मारेक-यांची रेखाचित्रे वगळता अन्य कुठलाही धागादोरा त्यांच्या हाती लागलेला नाही. तपास थांबल्यागत झालाय. थांबलेले नाहीत ते फक्त जेंच्या आईच्या, बहिणीच्या आणि पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू. आता तर डे यांच्या हत्येमागे पोलिस अधिकारीच असल्याचे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.
  पोलिसांवरंच प्रेशर वाढत चाललं तसं कुणातरी तिघांना पकडून हजर केलं गेलं. आणि लगेच रात्री सोडूनही दिलं. पोलिस या करामती नेहमीचकरत असतात. पण यामुळे पोलिस या हत्येबाबत मारेकर्यांचा शोध घ्यायला खरोखरीच कितपत सीरीयस आहेत हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तेल तस्करी, टोळीयुद्ध, मटका, रिअल इस्टेटकडे नजर वळलेल्या बडय़ा डॉन मंडळींची मोठमोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांतील भागीदारी आणि एसआरएतील गुंतवणूक, खंडणीखोर गुंड, मुंबईवर राज्य करण्यासाठी अंडरवर्ल्डमध्ये सतत सुरू असलेली चढाओढ, परदेशातील गुंडांच्या संपर्कात, पे रोलवर असणारे भ्रष्ट पोलिस अधिकारी, गुंडपुंडांचे आश्रयदाते राजकारणी यांच्यातील साटेलोटे.. या सगळ्याबद्दल जे बिनधास्त लिहायचा, त्याचं नेटवर्क जबरदस्त होतं, पोलिस खात्यात, अंडरवर्ल्डमध्ये, खब-यांच्या दुनियेत त्याला माहिती उपलब्ध व्हायची. त्याच्या या तपशीलवार पर्दाफाशमुळे पोलिसांना कारवाई करणे, हातपाय हलवणे भाग पडायचे. त्याच्या या लिखाणामुळे अनेकांची मोठी हानी झाली होती, अनेकांच्या काळ्या कारवाया उजेडात आल्या होत्या. त्यात गुंड होते, टोळ्या पोसणारे राजकारणी होते, तेल तस्कर होते आणि दुखावले गेलेले काही भ्रष्ट पोलिस अधिकारीही होते. अनेकांच्या मागावर असलेला जे आणखी काही धक्कादायक भांडाफोड करण्याच्या तयारीत होता. यापैकी कुणीतरी त्याला मार्गातून दूर केला असण्याची शक्यता आहे.

या सर्वापेक्षा जे डेंच्या हत्येला जबाबदार आहे, ती निष्क्रिय पोलिस यंत्रणा. डिझेल माफिया, मटका किंग, खंडणीखोर गुंड, परदेशात लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या सांगण्यानुसार इथे कुणावरही बंदूक रोखणारे, जीव घेणारे छोटे-मोठे शूटर, गुंडांना पोसणारे बिल्डर यापैकी कुणावरही कठोर कारवाई न करणाऱ्या मुंबई पोलिसांना जणू त्यांच्या ब्रीदवाक्याचा विसर पडला आहे. एकेकाळी अवघ्या अंडरवर्ल्डला जरब बसवणारे मुंबई पोलिस अवसान गळाल्यागत थंड पडले आहेत, हेच नेमके जेला खूपत होते. मुंबईला ग्रासणारा हा कॅन्सर पोलिसांना दिसत कसा नाही? या त्वेषात त्याने अनेक गोष्टी उघड केल्या, गुंडांना आणि त्यांना पाठीशी घालणा-या भ्रष्ट अधिका-यांना उघडे पाडले, त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले, बातम्या दिल्या. मुंबई शांत आहे, कुठे काय भानगडी सुरू आहेत.. अशा अविर्भावात डोळे मिटून बसलेल्या पोलिसांना त्याच्या तपशीलवार, पुराव्यानिशी दिलेल्या बातम्यांमुळे कारवाई करणे भाग पडले होते. त्याच्या या लिखाणामुळे तेलमाफियांचे प्रचंड नुकसान झाले होते, रियल इस्टेटमध्ये जम बसवू पाहणा-या अनेकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले होते. या सगळ्यांना तो काटय़ासारखा सलू लागला होता. साम, दाम यापैकी कशालाही जे भीक घालत नसल्यामुळे त्याची लेखणी कायमची थांबवणे हाच एक पर्याय या मंडळींसमोर होता. यामुळेच जे मारला गेला. पत्रकार, छायाचित्रकारांवर लाठय़ाकाठय़ा चालवणाऱ्या मुंबई पोलिसांनी आधीच गुंडपुंडांना जरब बसवली असती, संघटित गुन्हेगारीचा, खंडणीखोर टोळ्यांचा बिमोड केला असता, तर जेला या भ्रष्ट यंत्रणेला इतके भिडायची गरज पडली नसती, त्याचा जीव तरी वाचला असता..
 पत्रकारांनी लिहायचे आणि मगच पोलिसांनी हलायचे, असे दिवस आले असतील तर कठीण आहे. भ्रष्ट पोलिस, स्वार्थी राजकारणी आणि गुंड टोळ्यांचा ऑक्टोपस मुंबई कणाकणाने गिळतो आहे. छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्यांतील आरोपींपासून अगदी संघटित टोळ्यांपर्यंत कुणावरही कारवाई करण्याची इच्छाशक्ती न दाखवणारी निष्क्रिय पोलिस यंत्रणा याचीच पुष्टी देत आहे. पोलिस आणि राजकारण्यांपर्यंत सगळेच भ्रष्ट आहेत, असा सरसकट शेरा मारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसले तरी हे खरे असावे, असे वाटण्याइतकी जखम चिघळली आहे. आणि ‘विरुद्ध’ चित्रपटात अमिताभने साकारलेल्या असहाय्य बापासारखाच सर्वसामान्य मुंबईकरांचा चेहरा केविलवाणा दिसू लागला आहे.

Sunday, May 8, 2011

पनवेलची बुभुक्षित `श्वापदे'


पनवेलच्या कल्याणी आश्रमात निराधार, भिन्नमती मुलींच्या आयुष्याशी जे काही अकल्याण चालले होते ते एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उघडकीस आणले, दहाजणांना अटक झाली, संभवित विकृतांनी चालवलेले पशूपेक्षाही हीन वर्तन एेकून वाचून मनात संतापाचा लाव्हा खदखदत होता. तेव्हा उमटलेले हे शब्द... 
पनवेलच्या कल्याणी महिला आणि बालक सेवा संस्थेत भिन्नमती, अपंग, असहाय्य मुलींचा जो लैंगिक छळ सुरू होता तो पाहता या मुलींशी असे घृणास्पद दुर्वर्तन करणा-या संस्थाचालकांची आणि अशा कथित संभवितांची संभावना मानवी कातडे पांघरलेली बुभुक्षित श्वापदे म्हणूनच करावी लागेल. नीटसे बोलूही न शकणा-या, वाढते वय, वासनांध नजरा या कशाचीही जाण नसणा-या 19 अश्राप मुलींबरोबर गेली अनेक वर्षे या वासनासक्त मंडळींनी चालवलेल्या विकृत चाळ्यांचे पाढे एसीपी रश्मी करंदीकर यांच्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाचण्यात आले आहेत. लैंगिक छळाला विरोध करणा-या मुलींच्या हाता-पायांवर, नाजूक भागाजवळ सिगारेटचे चटके, तापत्या पळीचे, सळईचे डाग, शय्यासोबतीस नकार देणा-या मुलींना मारहाण, गळा दाबून मारण्याचे प्रयत्न, दोर रुतून जखमा होतील इतके घट्ट बांधून ठेवणे अशा भयानक यातना या मुली सहन करत होत्या. संस्थेत यायचे, पाहिजे ती मुलगी निवडून गच्चीवर न्यायची आणि तिचा उपभोग घ्यायचा, विरोध करणा-या मुलींना चटके द्यायचे, मारहाण करायची, बेल्टने झोडपून काढायचे, त्यांचा दुबळा प्रतिकार मोडून काढण्यासाठी त्यांना जबरदस्तीने दारू पाजायची, असे उन्मादी थैमान संस्थेत सुरू होते आणि संस्थाचालक रामचंद्र करंजुले याचीही त्यांना साथ होती. रामचंद्र, त्याची पत्नी सुरेखा, मुलगी कल्याणी, स्थानिक वार्ताहर असलेला त्याचा पुतण्या नानाभाऊ करंजुले, संस्थेतील दोन आया यांच्यासह एकूण दहाजणांवर हे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. समाजातील जागल्या म्हणून ज्याने खरे तर अशा गुन्हेगारांचे बुरखे ‘लोकमता’समोर टराटर फाडायला हवे होते अशा या नानाचाही या अत्याचारांमध्ये सहभाग होता. राज्याच्या अनेक भागांतील आश्रमशाळा, महिला आश्रम येथील निराधार मुले-मुली याच प्रकारच्या शोषणाला सामोरे जात असतात. शहापूर तालुक्यातील कवडास येथील आश्रमशाळेतील मुलामुलींवर असेच अत्याचार झाल्याचे यापूर्वी उजेडात आले होते. आश्रमशाळा, बालकल्याण व महिला संस्थांमधील या गैरप्रकारांकडे काणाडोळा करणा-या संबंधित यंत्रणांच्या धृतराष्ट्रीय पवित्र्यामुळे अशा मुखंडांचे आजवर फावत आले आहे. यापैकी अनेक प्रकरणांमधील आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना या शोषितांच्या बाजूने लढण्यासाठी कुणीही नाही ही शोकांतिका आहे. बलात्कारी व्यक्तींचे खच्चीकरण करण्याची सूचना मध्यंतरी दिल्लीतील एका महिला न्यायाधीशांनी केली होती. असहाय्य मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करून उजळ माथ्याने फिरू धजावणा-या अशा मानवी श्वापदांसाठी खरे तर यापेक्षाही कठोर शिक्षेची गरज आहे!

Tuesday, May 3, 2011

ओसामा संपला, आपल्यातील दहशतवादी कधी संपणार?

ओसामा बिन लादेन मारला गेल्यामुळे दहशतवाद आणि दहाशतवादी कमकुवत झाले असतील, असे समजणारे भोळेभाबडे काही बिचारे भ्रमात आहेत असे म्हणावे लागेल. ओसामा ही अमेरिकसाठी पर्सनल स्कोर सेटलमेंट होती. अमेरिकेला दणका देणार्या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या होता, त्याला मारून अमेरिकेने हिशेब चुकता केलाय. त्यामुळे दहशतवाद संपलेला नाही आणि संपणारही नाही. ओसामाला अमेरिकेने संपवले असले तरी दहशतवाद त्याच्यापुरता मर्यादीत नाही. आपल्या मनामध्ये दडलेल्या अतिरेकी विकारांचे काय? एखाद्या दहशतवादी घटनेनंतर उफाळून येणार्या विखारी भावनांचे प्रदर्शन होते तेव्हा नेमके काय घडत असते? आपल्यातील दहशतवादी कधी संपणार? अशा अनेक प्रश्नांची वावटळ माझ्या मनात भिरभिरत आहे. मला तर वाटतं, जोपर्यंत आपल्या अवतीभवती धर्मांधतेच्या भिंती आहेत, जातीयतेच्या घुसमटवणार्या विषवल्ली घुसमट करत आहेत, मनामनांवर याच द्वेषमूलक विचारांचा पगडा आहे, वेगळ्या जातीच्या, वेगळ्या धर्माच्या, वेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरांवरील लोकांविषयी काहीही कारण नसताना द्वेषभावना आहे तोपर्यंत आपल्यातही एक दहशतवादी दडलेला आहे.
तुम्ही लक्षात घ्या - एखादी घटना घडली की आपल्यापैकी बहुतेकजण कळत-नकळत आरोपी व्यक्तीची जात, धर्म विचारात घेतात आणि त्यानुसार, ज्याच्या-त्याच्या मनातील पूर्वग्रहानुसार मग त्यापुढील प्रतिक्रिया उमटते... अन्यधर्मीय व्यक्ती असेल तर मनात उगाचच त्या धर्माच्या सर्वांविषयी अनुदार, खरं तर तिरस्करणीय अशी खुन्नस दाटून येते. आपल्याच धर्माचा, कुंपणातील कुणी असेल तर है शाब्बाश, चांगला धडा मिळेल आता *त्यांना* असंही वाटून जातं. पुढे हीच भावना वेळोवेळी डोकं वर काढते, आपल्यातला दहशतवादी मातू लागतो. स्वानुभव सांगतो, दंगलींच्या नंतर, बॉम्बस्फोटांनंतर रात्री उशिरा गाडी पकडायचो तेव्हाचा अनुभव सांगतो.  डब्यात अवतीभवती असलेल्या सगळ्यांवर परस्परांची संशयाची  नजर फिरायची. एखाद्याला दाढी असेल , पेहरावावरून धर्म अळखता येत असेल तर पाहणार्याच्या नजरेत विखार, खुन्नस दाटून यायची. माझीही भावना फार वेगळी नसायची, पण मी त्यातून बाहेर पडलो. आजही माझा रात्री उशिरानेच प्रवास सुरू असतो. अन्य धर्मीय सोबतीला असतात, मी आजही सगळ्यांकडे निरखून पाहतो. माझ्या लक्षात येतं की कुणाचा जप सुरू आहे, कुणी लॅपटॉपवर काम करतोय तर, कुणी मोबाइल संभाषणात मग्न आहे. सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत, त्यांना त्यांचे रागलोभ-विकार आहेत. मग आपल्या मनात द्वेष कशासाठी? थोडा अधिक विचार केल्यावर लक्षात आलं - आपण द्वेष दाखवला, खुन्नस दाखवली की मनातला दहशतवादी जागा होतो, आपल्या बुद्धीचा, भावनांचा, विवेकाचा ताबा घेतो. धर्मांधता वा दहशतवादी प्रवृत्ती याच खतपाण्यावर तर वाढते. ती सुरूवात आपल्यापासून होऊ नये, इतरांनाही त्याची बाधा होऊ नये म्हणून आपापल्या परीने, वकुबानुसार जागं रहायला हवं, प्रयत्न करायला हवेत. हे असं होऊ नये म्हणून जमेल तितके सौहार्दाने वागायला काय हरकत आहे? ओसामा मारला गेल्यावर मनात कालपासून भिरभिरणारे हे विचारांचे भोवरे तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून लिहिलं...
मी फारच वेगळ सांगतोय असं नाही, मनात कालपासून जे उमटत होतं तेच इथे प्रकट केलंय. मी विचार केलाय, तूम्ही पण करा इतकेच!

Thursday, April 28, 2011

वाट लावतोय रिक्षावाला...


`कामावर जायला उशीर झायला, बगतोय रिक्षावाला गं वाट माझी बगतोय रिक्षावाला...' संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेले वर्ष-दीड वर्ष धुमाकूळ घालणाऱया या गाण्यात कल्याण-डोंबिवलीतील सहनशील प्रवाशांनी सध्या थोडासा बदल केला आहे. आरटीओ, वाहतूक शाखा आणि क्वचितप्रसंगी हुज्जत घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके खमके प्रवासी यांच्यातील कुणालाच न जुमानणाऱया उद्दाम, मुजोर रिक्षावाल्यांसाठी कल्याण-डोंबिवलीतील चाकरमान्यांनी `वाट माझी लावतोय रिक्षावाला' असे नवे गाणे उद्वेगाने म्हणायला सुरुवात केली आहे. भाडे नाकारणे, हुज्जत घालणे, मनाला येईल तेवढे पैसे मागणे अशा स्वरूपातील रिक्षाचालकांची मग्रुरी मुंबई-ठाण्याचे अडले-नडले प्रवासी रोजच अनुभवत असतात. पण, कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती त्यापेक्षाही भीषण टोकाला पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा न मानणारी अशी येथील रिक्षाचालकांची जमात आहे. त्यांना मीटर लावण्याचा कायदा ही सक्ती वाटते, मात्र, शेअरभाडय़ाचे दर आरटीओने ठरवून देण्याआधीच परस्पर भाडेवाढ करणे हा त्यांचा `न्याय' आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांना मराठमोळी नगरे म्हणून सुसंस्कृत चेहरा आहे. अनेक राज्यांतून पोटापाण्यासाठी मुंबई गाठणाऱयांनीही कल्याण-डोंबिवलीला आपलेसे केले आहे. या शहरांच्या सीमेबाहेर वसलेल्या मूळच्या गावा-पाडय़ांमध्ये विस्तारत गेलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये या सगळ्यांचे संसार नांदत आहेत. महापालिकेची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळे सकाळच्या धावपळीच्या वेळी कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली यापैकी कोणतेही रेल्वे स्थानक गाठायचे तर रिक्षाशिवाय तरणोपाय नाही. मीटरने भाडे ही संकल्पनाच रिक्षाचालकांना मान्य नसल्यामुळे शेअर रिक्षा म्हणजे हम करे सो कायदा अशी त्यांची मनमानी अनेक वर्षे सुरू आहे. आरटीओच्या `डोळे'वटारणीलाही भीक न घालणाऱया या रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांनांही `पुडी'त गुंडाळून खिशात ठेवले आहे. मनाला येईल तेव्हा शेअरभाडे वाढवून प्रवाशांची लुबाडणूक करणाऱया या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांची बाजू घेऊन ज्या राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उभे राहायला हवे, त्याच पक्षांनी आश्रय दिल्यामुळे रिक्षा संघटनांचेही फावले आहे. ही लुबाडणूक आणि प्रवाशांना वाऱयावर सोडणाऱया यंत्रणांबद्दल आम्ही सातत्याने आवाज उठवल्यानंतर आरटीओने शेअररिक्षाचे दरपत्रक जाहीर केले खरे, पण हे दरपत्रक न जुमानता आजही रिक्षाचालकांनी वाटमारी सुरू ठेवली आहे. अनेकांना तर दरपत्रक असल्याचेच माहिती नाही. सरकारी यंत्रणांचा या संघटित लुबाडणुकीला आशीर्वाद आहे, यात शंकाच नाही. आता प्रवाशांनीच बहिष्काराचे अस्त्र उपसून `वाट बगतोय रिक्षावाला' असे म्हणण्याची वेळ रिक्षाचालकांवर आणायला हवी.

Wednesday, April 27, 2011

लिहायचं की वाचायचं...

माझ्या मनात पुन्हा तोच सनातन संघर्ष सुरू झालाय... लिहायचं की वाचायचं... मोठ्या उत्साहात ब्लॉग लिहायचा संकल्प सोडला होता आणि आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ब्लॉग लिहिणचं सोडल्यागत झालंय. आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो. तीही सबबच लिहायचं नाही म्हणून... लिहायचं नाही म्हणजे कंटाळा येतो किंवा काही सुचत नाही म्हणून थांबलोय असंही नाही. पण वाटतं की कितीजणांनी इतकं उत्कृष्ट लिहून ठेवलंय तेच वाचायला वेळ पुरत नाही तर लिहिण्यात आणखी वेळ घालवणं कसं काय बुवा योग्य आहे.. मग लिहायचं असलं तरी टाळलं जातं. पण मी थांबलोय हे काहींच्या लक्षात आलं आणि त्यांनी आस्थेनं विचारलं म्हणून पुन्हा हे इतकं लिहिलं... आता कदाचित लिहिन वा थांबेनही... पाहू !!

Monday, April 4, 2011

तुह्या गनेश कंचा?




कुणाचं डोकं कशावरून सटकेल सांगता येत नाही. काहीही कारण प्रक्षोभक ठरू शकतं. आता याच मजकूराच्या प्रारंभी दिलेली गणेशचित्रे तुम्ही पाहिली असतीलच! तुम्हा-आम्हाला ती गणेशचित्रे वाटली तरी आणखी कुणाला त्यांत काही वेगळेच दिसू शकते. अगदी `भलतेच आक्षेपार्ह' असेही काही वाटू शकते. या गणेशचित्रांचे चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी ठाण्यात या चित्रांचे प्रदर्शन भरवले आणि पायावर जणू भला मोठा धोंडाच पाडून घेतला. `ही कसली चित्रे, हा मुळात गणपतीच नाहीये, ही विटंबना आहे गणेशाची...', असं काय-काय बडबडत ठाण्यातील काही जागरूक गणेशप्रेमी मंडळी त्यांच्यावर चालून आली. म्हापसेकरांना चित्रं उलटी करावी लागली. या मंडळींचंही बरोबर होतं. त्यांना या चित्रांत गणपती दिसत नव्हता, गणपती असा नसतोच मुळी..., असा त्यांचा आक्षेप होता. गडबड झाली ती म्हापसेकरांची. मी कसा दिसतो हे गणपतीने या मंडळींना सांगून ठेवल्याचं त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे चित्रं काढताना त्यांनी आधी या  मंडळींना विचारलंच नाही, त्यांची परवानगी घेतली नाही. यामुळे सारं बिघडलं. आणखी एक बारीक गडबड झाली ती या मंडळींची. म्हापसेकरांना गणपती अशा वेगवेगळ्या आकारांत दिसतो, ज्याला-त्याला, चित्रकाराला, प्रत्येक सश्रद्ध व्यक्तीला त्याचे श्रद्धास्थान, दैवत अनेक आकारांत, प्रकारांनी दिसू शकते हे लक्षात न घेतल्यामुळे त्यांचंही डोक सटकलं असणार. त्यांना मतं आहेत, त्यांची आग्रही भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे इतरांचीही, चित्रकारांचीही असू शकते इतका साधा विचार या गोंधळात सटकलेल्या डोक्यात येणं जरा अवघडच की!
या मंडळींनी म्हापसेकरांची पंचाईत केली आणि त्यांनी चित्रं उलटी फिरवली. एवढय़ावरच प्रकरण थांबलं नाही. त्या चित्रप्रदर्शनात आणखी कुणा `मनातून धर्म'वाल्या मंडळींनी म्हापसेकर यांना गाठलं नंतर. `तुम्ही चित्रं उलटी फिरवलीतच कशी? गणपतीचे तोंड भिंतीकडे फिरवता? कुठे फेडाल ही पापं? तुम्ही आमच्या भावनांचा, श्रद्धांचा, दैवताचा अपमान केलाय. ताबडतोब ही चित्रं पुन्हा सुलट करा...', अशी त्यांची भाषा. वैतागून म्हापसेकरांनी रविवारी संध्याकाळी सगळी चित्रंच उतरवली आणि प्रदर्शन आटोपतं घेतलं.
यात झालं काय की खुद्द गणपतीनं ज्यांना `दर्शन' देऊन तो असा दिसतो, असं सांगितलं होतं त्या मंडळींनी मुळात त्यांचा गणपती कसा दिसतो हे सांगितलंच नाही. आता यापुढे गणेशमूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार अशा मंडळींनी कृपया त्यांच्याशी संपर्क साधून आधी या मंडळींकडून कॉपीराईट घ्यावा आणि मगच मातीत, रंगात हात-ब्रश घालावा... नपेक्षा अशा मति फिरलेल्या मंडळींकडून त्यांच्या कामाची माती व्हायला वेळ लागणार नाही, आधीच सांगून ठेवतो!
जाता जाता - मागे कधीतरी मी कुणा गणेशभक्त, कुणा कृष्णभक्त व्यक्तींना त्यांचे आराध्य दैवत साक्षात दर्शन देते असं ऐकलं-वाचलं होतं. त्यांच्याकडून ही दैवतं कशी दिसतात ते जाणून घ्यायचं राहिलं याची हळहळ वाटतेय. मी उगाचच आपला चित्रकारांनी चितारलेल्या दैवत चित्रांसमोर, देव्हाऱयातल्या मूर्त़ींसमोर आजवर नतमस्तक होत राहिलो. माय मिस्टेक!


Friday, March 25, 2011

हॉलिवुडची `क्वीन'


एलिझाबेथ टेलर गेल्याची बातमी आली आणि अनेकांना तिचे, कॅट ऑन हॉट टिन रुफ, सडनली, लास्ट समर, को वादिस, क्लिओपात्रा, बटरफिल्ड 8, हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ?, ` टेमिंग ऑफ श्रू' यासारखे अप्रतिम चित्रपट आठवले आणि त्यापेक्षाही अनेकांना तिने केलेली आठ लग्ने आठवली. नामवंत, त्यातही रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलेल्या, व्यक्तींबाबत जी शोकांतिका घडते तेच लिझच्या बाबतीतही घडावे हा दुर्दैवी योगायोग आहे. सेकंदाला 24 फ्रेम्स या गतीने कलाकारांच्या अभिनयाची आणि देखणेपणाची, सौंदर्याची कसोटी लागलेली असते त्या रुपेरी पडद्यावरचा काही काळ आपल्या अभिनयाने आणि आरस्पानी सौंदर्याने गोठवून ठेवण्याचे सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एलिझाबेथ उर्फ लिझ ही एक होती. हॉलिवुडमध्ये तिचे नाव गाजू लागले तो हॉलिवुडचा सुवर्णकाळ होता. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात होऊन एका दशकापेक्षा अधिक वर्षे उलटली होती. तिच्या नीलकमल नेत्रांचे मदनबाण, मादक सौंदर्य जेव्हा शेकडोंना घायाळ करत होते त्याचवेळी पीटर उस्तीनोव्ह, पॉल न्यूमन, रिचर्ड बर्टन, मार्लन ब्रँडो, कॅथरिन हेपबर्नसारखे अभिनयाचे मापदंड तिच्या अभिनयसामर्थ्याची वाखाणणी करत होते. वयाच्या नवव्या वर्षी, 1942मध्ये `देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट', `लॅसी कम होम' या लागोपाठच्या दोन चित्रपटांमधून लिझचे रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून पहिले पाऊल पडले होते. बहुतेक बालकलाकारांच्या नशिबात रुपेरी पडद्यावरील क्षणिक प्रसिद्धी आणि नंतर उपेक्षेचा अंधार असतो. पण लिझ ही वेगळी चीज होती हे तिने एमजीएमच्या `नॅशनल वेल्व्हेट' या चित्रपटातून दाखवून दिले. या वेळी ती दहा वर्षांची होती. 1951चा प्लेस इन सन, को वादीस, कॅट ऑन हॉट रुफ, सडनली, लास्ट समर असे चित्रपट करता-करता तिचे सौंदर्य आणि अभिनय जोडीनेच बहरत होते. रंगमंचीय अभिनयकलेचेच धडे पडद्यावरही गिरवण्याचा, मेथड ऍक्टींगचा तो काळ होता. अशा वेळी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेल्या एलिझाबेथने तिच्या उत्स्फूर्त अभिनयशैलीने हॉलिवूडमध्ये वेगळी वाट निर्माण केली.  `बटरफिल्ड 8' या चित्रपटातील हायसोसायटी कॉलगर्लच्या भूमिकेसाठी तिला पहिले ऑस्कर मिळवून दिले. तिच्यातील अभिनेत्री या गौरवाने कमालीची सुखावली होती. प्रत्यक्षातील एलिझाबेथचे उत्फुल्ल व्यक्तिमत्व, सहज वावर पडद्यावरील तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून डोकावत असे. `क्लिओपात्रा'पासून अगदी 1980मधील ` मिरर क्रॅक्ड'पर्यंत प्रत्येक चित्रपटात हा अनुभव येतो. `क्लिओपात्रा' हा तिचा बर्टनबरोबरचा पहिला चित्रपट. रिचर्ड बर्टन तेव्हा विवाहित होता. पण लिझ आणि तो परस्परांमध्ये कधी गुंतत गेले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. प्रत्यक्षात आणि पडद्यावर त्यांचे प्रणयप्रसंग खुलू लागले. `हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ?' या तिच्या बर्टनबरोबरच्या चित्रपटाने तिला दुसरे ऑस्कर मिळवून दिले. तोपर्यंत ते विवाहबद्धही झाले होते. हे लग्न दहा वर्षे टिकले. एकदा काडीमोड घेऊन या दोघांनी परस्परांशी पुन्हा लग्न केले होते. बर्टनशी पुन्हा घेतलेल्या घटस्फोटाने तिला मद्यासक्ती, ड्रग्ज, अतिखाणे अशा विकारांच्या वाटेवर नेऊन सोडले. तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. एक उत्तम अभिनेत्री, हॉलिवुडची अनभिषिक्त सम्राज्ञी या नामाभिधानांबरोबरच खासगी आयुष्यात, दुसऱयांचे नवरे पळवणारी, संसार मोडणारी अशी नकोशी बिरुदेही तिला तोवर चिकटली होती. सात घटस्फोट, आठ लग्ने, विवाहित पुरुषांशी प्रेमप्रकरणे आणि लग्न यामुळे तिची बदनामी झालीच, पण व्हॅटिकननेही तिला बहिष्कृत ठरवले होते. मधल्या काळात तिचा मित्र आणि गायक-अभिनेता रॉक हडसन याचा एड्सने बळी घेतला आणि एलिझाबेथ हादरली. त्याच्या जाण्याने तिला एड्स संशोधनविषयक फाऊंडेशनची स्थापना करण्याची प्रेरणा दिली. या क्षेत्रातील योगदानामुळेच तिला ऑस्कर अकादमीने तिसरे गौरवपर ऑस्कर प्रदान केले. 
अनेक व्याधी-विकारांचा सामना करता-करता तिच्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली होती. `मला पैसा, प्रसिद्धी, उत्तम जीवन सगळं काही विनासायास मिळाल्यागत वाटत असलं तरी मी भोगलंही खूप आहे', अशी वेदना तिने एकदा बोलून दाखवली होती. खेदाची बाब ही की अभिनयासाठी दोनवेळा ऑस्कर मिळवूनही समीक्षकांनी तिच्या अभिनयगुणांपेक्षा तिच्या रसरशीत शरीरसौष्ठवाच्या पारडय़ातच नेहमी काकणभर वजन अधिक टाकले होते. तरीही, चित्रपट, ब्रॉडवे आणि टीव्ही या माध्यमांतील उण्यापुऱया सात दशकांची रुपेरी कारकीर्द आणि 50हून अधिक चित्रपटांमधील ताकदीचा अभिनय लक्षात घेता, लिझसारखी सौंदर्यवती अभिनयसम्राज्ञीही असू शकते का, या प्रश्नाचे उत्तर तिचा वकूब ओळखून असणाऱया दिग्गज दिग्दर्शकांनी, तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी नेहमीच होकारार्थी दिले आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेली एलिझाबेथ ही हॉलिवुडसाठी `क्वीन' एलिझाबेथच होती एवढे नक्की!